महापालिका निवडणुका लढताना स्थानिक घटकांचा विचार घेऊनच निर्णय : तटकरे   

पुणे : राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविताना प्रत्येक महापालिकेत स्थानिक घटकांचा विचार करुन वेगवेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, हे करताना महायुतीच्या ऐक्याला तडा जाणार नाही, याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे स्पष्ट करत आगामी महापालिकांच्या निवडणूका प्रत्येक पक्ष गरजेनुसार स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
 
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा २६ वर्धापनदिनानिमित्त बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे संकेत दिले.
 
तटकरे म्हणाले, राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीची सत्ता आहे. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका या तिनही पक्षांनी एकत्र लढविल्या होत्या. त्यामध्ये मतदारांनी विश्वास दाखवून केंद्रात आणि राज्यात महायुतीला सत्तेची संधी दिली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार राज्य सरकारने निवडणुकीची तयारी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात या निवडणूका होण्याची शक्यता आहे. 
 
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आलेला नाही
 
राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष एकत्रित येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता, दोन्ही पक्ष एकमेकांमध्ये विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव आलेलाच नाही. या केवळ चर्चा आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. हा सामुहिक निर्णय होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून सामोरे गेलो आणि राज्यातील मतदारांनी अजितदादांना बहुमत देत त्यांच्या बाजुने कौल दिला. ज्यांना अजित पवार यांची भाजपला पाठींबा देण्याची भूमिका पटत आहे. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. येणार्‍या काळातही मोठ्या संख्येने प्रवेश होतील.
 
विकृत गुन्हेगारी ठेचून काढण्यावर होणार चर्चा
 
पक्षाचा कोणताही कार्यकर्ता हा विकृत मनोवृत्तीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असता कामा नये, अशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने त्यांची तातडीने हाकलपट्टी करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनाही दिल्या होत्या. 
 
यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात यावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. विकृत गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असून वर्धापनदिन कार्यक्रमात यासह अनेक महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करुन ठराव देखील केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Articles